काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत एका कामासाठी गेले होते. तिथे ‘मुंबईची अधिकृत भाषा कोणती’ असा प्रश्न मला विचारण्यात आला. मी ‘मराठी भाषा’ असं उत्तर दिल्यावर ते लोक चकित झाले. महाराष्ट्राची राज्यभाषा, आर्थिक राजधानी असे बरेच घटक नंतर सांगितले; पण इतके दिवस मुंबईची भाषा ही हिंदीच असावी आणि काही मूठभर मराठी लोक मुद्दाम आपली मातृभाषा मराठी मुंबईतील लोकांच्या माथी मारण्यासाठी आंदोलने करतात असा त्यांना गैरसमज झाला होता.
भाषेवर अतिक्रमण कसं होत असेल हे लक्षात येतंय?
‘आमच्याशी मराठीत बोला’ हे सांगणाऱ्या अमराठी भाषिकांना मुळात तसं सांगणं हे मराठी भाषेवर अतिक्रमण आहे हेच माहित नसतं. त्यांच्या दृष्टीने ते जी भाषा बोलू शकतात, तीच भाषा सगळे बोलत असतात आणि आपण त्यांच्या ह्या गैरसमजाला त्यांच्या भाषेत बोलून खतपाणी घालतो.
जोवर दोन मराठी माणसे तिसऱ्या अमराठी भाषिकासमोर एकमेकांशी मराठीत बोलणार नाहीत, तोवर त्या अमराठी भाषिकांना मराठी भाषा ऐकण्याची, समजून घेण्याची, शिकण्याची संधी कशी मिळेल?